पाटणा : बिहारमधील नागरिकांना १२५ युनिट वीज मोफत मिळणार असून यासोबतच पुढील तीन वर्षांत घरगुती ग्राहकांना सौरऊर्जेचा लाभही मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी केली.
मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’वर सांगितले की, आम्ही सुरुवातीपासूनच सर्वांना स्वस्त दरात वीज पुरवत आहोत. आता आम्ही निर्णय घेतला आहे की १ ऑगस्ट २०२५ पासून म्हणजेच जुलै महिन्याच्या बिलातून, राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना १२५ युनिटपर्यंतच्या विजेसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत.
राज्यातील एकूण १ कोटी ६७ लाख कुटुंबांना याचा फायदा होईल. तसेच पुढील तीन वर्षांत या सर्व घरगुती ग्राहकांना त्यांची संमती घेऊन त्यांच्या घरांच्या छतावर किंवा जवळच्या सार्वजनिक ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प बसवून त्यांचा फायदा करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
‘कुटीर ज्योती’ योजनेअंतर्गत अत्यंत गरीब कुटुंबांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल. उर्वरित कुटुंबांसाठीही सरकार पुरेसे सहकार्य करेल, असे ते म्हणाले. यामुळे, घरगुती ग्राहकांना आता १२५ युनिटपर्यंतच्या विजेसाठी काहीही खर्च करावा लागणार नाही आणि एका अंदाजानुसार, पुढील तीन वर्षांत राज्यात १० हजार मेगावॅटपर्यंत सौर ऊर्जा उपलब्ध होईल, असे त्यांनी नमूद केले.