गेली काही महिने उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या गाठीभेटींमुळे ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. अखेर राज्यामध्ये पुन्हा एकदा भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार असलायची घोषणा झाली आहे. कारण शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पत्रकार परिषदेमध्ये वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले की, "शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना येऊन भेटले. त्यांच्यामध्येही दोन बैठका झाल्या. यामध्ये युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली आहे. वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडीत समाविष्ट करून चार पक्षीय आघाडीतून निवडणूक लढवणार की शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच निवडणूक लढवणार? हे शिवसेनेने स्पष्ट करावे. या बाबतीतला निर्णय त्यांच्याकडून समजला की पुढच्या टप्प्याची चर्चा सुरु होईल." असे स्पष्ट केले आहे.