
राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे धुळवडीचा उत्साह राज्यात पाहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या हे सरकार पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे आणि पंचनामे करावेत," असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात येत असताना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.