छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर, "२ एप्रिलची महाविकास आघाडीची सभा होऊ नये, यासाठी हा हिंसाचार घडवून आणला" अशी टीका संजय राऊतांनी केली होती. त्यानंतर आता मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "जर महाविकास आघाडीच्या सभेमुळे वातावरण बिघडेल गोंधळ होईल, असा अहवाल पोलिसांनी दिला तर सभेला परवानगी नाकारली जाईल," असे सूचक विधान त्यांनी केले. दरम्यान, महाविकास आघाडीच्या या सभेला काही अटी घालण्यात आल्याची चर्चादेखील आहे.
भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या सभेबाबत काय करायचे? याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरावर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी किंवा गुप्तचर खात्याने, सभेमुळे गोंधळ होईल असे काही अहवाल दिले तर ही सभा थांबवली जाऊ शकते. त्याबाबत पोलीस आणि राज्य सरकार निर्णय घेईल. त्या अहवालांनुसार सभेला परवानगी नाकारतील. सध्या प्रशासनाकडून सर्व चौकशी सुरू आहे. पोलीस प्रशासनावर जबाबदारी असून ते म्हणाले तर सभा होणार नाही" असे स्पष्ट केले आहे.