पावसाळा जवळ आल्याने मुरुडचा सुप्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग गुरुवार (ता. २६) पासून पर्यटकांना पाहण्यासाठी बंद करण्यात येत आहे, अशी माहिती मुरूड येथील पुरातत्व खात्याचे अलिबाग-मुरूडचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.
पावसाळ्यात समुद्रात उंच उसळणाऱ्या लाटा, वादळ, हेलकावे यामुळे होऊ शकणारी दुर्घटना टाळण्यासाठी पुरातत्व विभाग आणि मेरिटाइम बोर्ड दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षितता म्हणून राजपुरी खाडीतील जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी बंद ठेवत असतात. यातून कुणाचाही आनंद हिरावून घेण्याचा अथवा कुणाचेही नुकसान करण्याचा हेतू नाही, अशी माहिती येलीकर यांनी दिली.
उन्हाळी सुट्टी असल्याने जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. प्रतिवर्षी ५ लाख पर्यटक जंजिरा पाहण्यासाठी येतात. २२ एकरवर उभा असणाऱ्या जंजिऱ्यावर १९ बुरुज आहेत. पूर्वी ५१४ तोफा होत्या. त्यातील मोजक्याच दिसून येतात इतिहासात जंजिरा हा "अजिंक्य किल्ला" अशी नोंद असल्याने जंजिरा पाहण्याचे पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण दिसून येते. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढती आहे. जंजिरा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे येथील बोट चालक, लाँच मालक यांना उदरनिर्वाहाचे मोठे साधन आहे. त्यामुळे जंजिरा खुला असणे गरजेचे आहे. असे त्यांचे मत आहे.