
राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणूकीची मतमोजणी सुरु आहे. यापैकी जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींचे निकाल हाती झाले आहेत. त्यात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) आणि शिवसेना(शिंदे गट) यांची जोरदार मुसंडी मारल्याचं दिसत आहे. तर काँग्रेससोबत शरद पवार गट आणि ठाकरे गटाची मोठी पिछेहाट झाली आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत १३२२ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात महायुतीने तब्बल ७८८ जागांवर बाजी मारली आहे. तर महविकास आघाडीला २९२ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे. तर इतरांना १६२ ठिकाणी विजय मिळाला आहे.
आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांत भाजपा, शिवसेना शिंगे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी मिळून ७८८ ग्रामपंचायतींवर निजय मिळाला आहे. यात भाजपने ३७२ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. तर अजित पवार गटाने जोरदार मुसंडी मारत २४२ ग्रामपंयाचींवर वियश्री खेचून आणला आहे. असं असलं तरी महायुतीतील शिंदे गटाची मात्र पिछेहाट झाली आहे. शिंदे गटाला १७४ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे.
आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या निकालातून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत लागलेल्या निकालांमध्ये महाविकास आघाडीने २९२ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. त्यात काँग्रेसने १२६ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने ८८ ग्रामपंचायतींवर ताबा मिळवला आहे. बारामतीमध्ये देखील शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून येथील ग्रामपंचायतींमध्ये अजित पवार गटाने मुसंडी मारल्याचं दिसून आलं आहे.
आजच्या निकालामंध्ये शिवसेना ठाकरे गटाची देखील मोठी पिछेहाट झाल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये ठाकरे गटाला फक्त ७८ ग्रामपंचायतींवर आपलं वर्चस्व राखता आलं आहे. तर इतरांनी १६२ ठिकाणी यश मिळवलं आहे.