
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'निवडणूका कधीही लागतील, आधीच दारुगोळा साठवून ठेवलेला बरा' असे सूचक विधान केले होते. तसेच, आगामी निवडणुकीमध्ये राज ठाकरेंची मनसे कोणाला साथ देणार? भाजपसोबत युती करणार की शिंदे गटासोबत? या चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता शिंदे गटाच्या एका मंत्र्याने मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या जोडीला कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे सुद्धा रत्नागिरीत आले आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "राज ठाकरे आमच्यासोबत आले तर स्वागतच आहे." असे म्हणत त्यांनी मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांना वाट मोकळी करून दिली.
मंत्री अब्दुल सत्तर म्हणाले की, "राज ठाकरे हे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे मनसेने कोणासोबत युती करावी, हे तेच ठरवतील. तो सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल. पण ते आमच्यासोबत आले तर आम्ही स्वागतच करू. आमच्या सर्व नेत्यांनी त्यांना सन्मानाने आमच्यासोबत येण्याचे आवाहन केले आहे. पण शेवटी राज ठाकरेच निर्णय घेतील. ते काय निर्णय घेतील, हे सांगू कोणीही सांगू शकत नाही." त्यामुळे आता आगामी निवडणुकांसाठी मनसे आणि इतर नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहेत का? मनसेची यावर काय भूमिका असणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.