मुंबई : राज्यात पाच लाखांहून अधिक नोकरदार महिला आहेत. आपल्या मुलांची योग्य काळजी घेता यावी यासाठी केंद्र सरकारच्या मिशन शक्ती अंतर्गत राज्यात ३४५ ठिकाणी ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी 'पाळणाघर' ही योजना सुरू करण्यात आली आहे. यात सर्वाधिक मुंबई उपनगरात ५५ पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईतील नोकरदार महिलांनी पाळणाघराला पसंती दिली आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. पाळणाघरात डे-केअर सुविधा, पूर्व शालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, वाढीचे निरीक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच मुलांना दिवसातून तीन वेळा म्हणजेच सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम शिजवलेले जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता देण्यात येणार आहे.
पाळणाघर महिन्यातील २६ दिवस, दररोज ७.५ तास सुरू राहील. यामध्ये जास्तीत जास्त २५ मुले असतील. याठिकाणी एक पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल. वीज, पिण्याचे पाणी, बालस्नेही शौचालय यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.
अंगणवाडी सेविका यांना प्रतिमाह १,५०० रुपये भत्ता देण्यात येणार आहे. अंगणवाडी मदतनीस यांना ७५९ प्रतिमाह, पाळणा सेविका यांना ५,५०० प्रतिमाह मानधन, तर पाळणा मदतनीस यांना ३ हजार रुपये प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे.
पाळणाघरांची जिल्हानिहाय संख्या
मुंबई उपनगर - ५५
ठाणे - ३४
पुणे - २७
कोल्हापूर - २२
छत्रपती संभाजीनगर - २०
नागपूर - १६
सोलापूर - ११
नाशिक - १०
अहिल्यानगर - १०
वाशीम - ९
धुळे - ९
सातारा - ८
गडचिरोली - ८
मुंबई शहर - ८
जळगाव - ७
अकोला - ७
अमरावती - ६
धाराशिव - ६
चंद्रपूर - ६
नंदुरबार - ०