
ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा नव्याने ओबीसी आरक्षणासह सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्याने दिली. २३६ प्रभागांची नव्याने सोडत काढण्यात येणार असून एका आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाकडून सूचना मिळाल्यानंतर मुंबई महापालिकेला पुन्हा नव्याने सोडत काढणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणासह प्रभाग सोडत काढावी लागणार आहे. तसेच २३६ प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत असेल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
२०१७च्या निवडणुकीत २२७ प्रभाग होते; मात्र २०२२ च्या निवडणुकीत २२७ प्रभागात ९ ने वाढ झाली आणि आता २३६ प्रभाग झाले आहेत. ३१ मे रोजी २३६ प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर केली होती. मात्र आता ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे २३६ प्रभागांची सोडत ओबीसी आरक्षणासह काढण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्याने मुंबई महापालिकेसह राज्यभरातील महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.