मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'जातीय राजकारणाची सुरुवात ही राष्ट्रवादीच्या जन्मापासून झालेली' असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केला होता. (NCP vs MNS) यानंतर आता विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने शरद पवारांवर हा आरोप करणे हास्यास्पद आहे. त्यांनी केलेलं आरोप हे बिनबुडाचे आहेत. याच राज ठाकरेंनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हा काय त्यांच्याबद्दल काय बोलत होते? इतके दुटप्पीही माणसाने वागू नये," असे म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
माध्यमांसमोर बोलताना अजित पवार म्हणाले की, "महाराष्ट्र गेली ५५ वर्ष शरद पवारांना ओळखतो. त्यांनी नेहमीच राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोळ्यांसमोर ठेवले. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालायचं काम केलं. मुळातच, राज ठाकरेंनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. शरद पवारांचे नाव घेतले की ती बातमी होते. राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे योग्य नाही."
सिंधुदुर्गमध्ये पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे म्हणाले होते की, "जातीय राजकारणाची सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासूनच झाली. शरद पवार यांनी कधीही शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. त्यांना मुस्लिम मते जाण्याची भीती वाटतेय. म्हणूनच इतर टोळ्या उभ्या करून हे राजकारण करत आहेत. त्यातून फंडिग गोळा करण्यात आले आहे. १९९९पासून हे विष राज्यात कालवलं गेले आहे." पुढे त्यांनी, 'जातीच्या राजकारणासाठीच शिवाजी महाराजांचा अवमान केला जात आहे. याआधी जी लोकं होती त्यांना काय इतिहास माहीत नव्हता का? तो आत्ताच का जागृत झाला?' असा सवाल राज ठाकरे यांनी केलं होता.