
नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ब्रिटनमध्ये असलेली 'वाघनखे' तीन वर्षासाठी महाराष्ट्रात परतणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचं नखांनी विजापुरच्या आदिलशाहीतील बलाढ्य सरदार अफझल खानचा कोथडा बाहेर काढला होता.
महाराष्ट्राच्या इतिहासात या वाघनखांना विशेष असं महत्व आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही वाघनखे भारतात आणण्याचे अफाट प्रयत्न सुरु होते. आज त्या प्रयत्नांना यश आलं आहे. अहवालानुसार, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाने महाराष्ट्र सरकारला ही वाघनखे अवघ्या तीन वर्षांसाठी देण्याचं मान्य केलं आहे. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे फक्त 3 वर्षांसाठी ब्रिटनमधून महाराष्ट्रात परतणार आहेत.
ही ऐतिहासिक वाघनखे महाराष्ट्रातील चार प्रमुख संग्रहालयांमध्ये ठेवण्यात येणार आहेत. यात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय आणि कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस, या चार ठिकाणी ही वाघनखे प्रदर्शित केली जाणार आहेत.
वाघनखांची सुरक्षित वाहतूक आणि प्रदर्शन सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारनं ११ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. संस्कृती विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत मुंबई आणि नागपूर येथील पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांसह नोकरशहा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.