
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत एक निवेदन केले. कांद्याला देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच, आदिवासींच्या वनजमिनीच्या दाव्याबाबत समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. अशी घोषणा त्यांनी केली. तसेच, त्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून लाँग मार्च मागे घेण्यात यावा, असे आवाहनदेखील मुख्यमंत्री शिंदेंनी केले.
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत चर्चेतील मागण्यांबाबत माहिती दिली. दरम्यान, शेतकरी, कामगार, अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये माजी आमदार जीवा पांडू गावित आणि आमदार विनोद निकोले यांचा समावेश असणार आहेत. मागण्यांसंदर्भात महिन्याभरात समितीने अहवाल द्यावा, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.