मुंबई : रेल्वे हद्दीतील बेकायदा फेरीवाले, तिकीट दलालांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मध्य रेल्वेच्या फेरीवाला विरोधी पथकाने १२ फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल केले. तसेच १८,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर आयटी व आरपीएफच्या पथकाने दोन ठिकाणी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईतून दोन तिकीट दलालांना अटक केली.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे हद्दीत असलेल्या बेकायदा फेरीवाले, तिकीट दलाल, विना तिकीट प्रवास करणारे या विरोधात मध्य रेल्वेच्या फेरीवाला पथक, आरपीएफ व आयटी सेलच्या पथकाने विविध ठिकाणी कारवाईचा बडगा उगारला. फेरीवाला विरोधी पथकाने १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत अत्यंत यशस्वी मोहीम राबवली आहे. फेरीवाला विरोधी पथकाने अनेक एक्स्प्रेस गाड्यांमध्ये तपासणी केली. यात १२ फेरीवाल्यांविरोधात कलम १३७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तर विनातिकीट प्रवास करणाऱ्या १२ प्रवाशांविरोधात कारवाई करत १३,५१० रुपये दंड वसूल करण्यात आला.
दोन तिकीट दलालांना अटक
तिकीट दलालांविरोधात आरपीएफ व आयटी सेलच्या पथकाने चुनाभट्टी (निवास) आणि चिंचबंदर पोस्ट ऑफिसमधून २ दलालांना अटक करण्यात आली. त्यांना संबंधित सीआर क्रमांक ८२९/२०२३ आणि ८०२/२०२३ सह भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत आरपीएफ वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांच्याकडे सोपवण्यात आले.