
सांगलीमध्ये खत खरेदी करताना एक धक्कादायक प्रकार समोर आला. रासायनिक खत खरेदी करताना पॉस मशिनवर शेतकर्यांना आपली जात सांगावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचे पडसाद आज विधानसभेतही पाहायला मिळाले. विरोधकांनी यावर आक्रमक पवित्रा घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "ते पोर्टल केंद्र सरकारचे असल्यामुळे आम्ही केंद्र सरकारला ही चूक दुरुस्त करावी, असे सांगितले आहे." असे स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, "खतांची खरेदी करताना सांगलीत शेतकऱ्यांना जात विचारली जात आहे. मशीनमध्ये जातीचा रकाना भरल्याशिवाय प्रक्रिया पुढे जात नाही आहे. याप्रकरणी सरकारने तातडीने पाऊले उचलावीत. यामध्ये कोण मुद्दाम गडबड करतो आहे का? त्याचा आढावा सरकारने घ्यावा. ई-पास प्रकरणी चौकशी करुन त्वरित कारवाई करावी." अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण देताना म्हंटले की, "राज्याकडून सदरचा प्रश्न केंद्राला विचारला आहे. असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. चूक झाल्यास तात्काळ सुधारणा करु. कोणत्याही सरकारने जातीची अट घालण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही." असे स्पष्टीकरण दिले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "हे पोर्टल केंद्र सरकारचे आहे. शेतकऱ्यांच्या भावना आम्ही लक्षात घेत आहोत. ही चूक सुधारण्यात यावी, असे केंद्र सरकारला सांगण्यात आलेले आहे."