
गेले चार महिने सतत बरसणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाने २३ ऑक्टोबरला आपला मुक्काम देशातून हलवला आहे, अशी घोषणा भारतीय हवामान खात्याने केली. दरवर्षी तो ८ ऑक्टोबर रोजी देशातून जात असतो. यंदा तो जास्त रेंगाळला. येते दोन दिवस शहरात आकाश निरभ्र राहणार आहे. मुंबई हवामान खात्याचे प्रमुख जयंत सरकार म्हणाले की,नैऋत्य मोसमी पावसाने मुंबईतून नव्हे, तर देशातून ‘एक्झिट’ घेतली आहे. २३ ऑक्टोबर रोजी तो आपल्या देशातून परतला आहे.
देशाच्या विविध भागातून परतीचा पाऊस सुरू झाला होता. मात्र, ऑक्टोबरमध्ये मुंबई व परिसरात जोरदार पाऊस झाला. कोकण व गोव्यात मुसळधार पाऊस झाला होता. आता हे पाऊस वाहून नेणारे वारे महासागराच्या दिशेने गेले आहेत. त्यामुळे मान्सून परतला आहे.
यंदा ऑक्टोबरमध्ये २२६.३ मिमी पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी ९१ मिमी पाऊस पडला होता. गेल्या वर्षी पाऊस १४ ऑक्टोबर रोजी परतला होता.