
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. देशभरातील प्रतिनिधी या अधिवेशनास उपस्िथत होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे भाषण होण्याआधीच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे व्यासपीठावरून निघून गेले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आधी भाषणाची संधी दिल्याने ते नाराज होऊन निघून गेल्याचे म्हटले जात आहे; मात्र पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची भाषणे तिथे अपेक्षित होती, म्हणून मी बोललो नाही.मी महाराष्ट्रात जाऊन बोलेन, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. जयंत पाटील यांनीही अजित पवार नाराज नसल्याचे म्हटले आहे; मात्र पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे भाषण सुरू होत असतानाच अजित पवारांचे व्यासपीठावरून निघून जाणे अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्ली येथे सुरू असून व्यासपीठावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतील सर्व दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव भाषणासाठी घेतले. तेव्हा अजित पवार व्यासपीठावरून निघून गेले. जयंत पाटील यांचे नाव आधी घेतल्याने अजित पवार नाराज झाल्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळे त्यावेळी अजित पवार यांची समजूत घालण्यासाठी गेल्या. प्रफुल्ल पटेल यांनी नंतर अजित पवारांचे नाव भाषणासाठी पुकारले; मात्र अजित पवार व्यासपीठावर नव्हते. ते लघुशंकेसाठी गेले आहेत, थोड्याच वेळात परत येतील, असे सांगण्यात आले; मात्र ते न आल्याने शरद पवार यांनी आपले भाषण सुरू केले. यामुळे अजित पवार नाराज झाल्याच्या चर्चा आहेत. “हे काही महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन नव्हते, तर राष्ट्रीय अधिवेशन होते. त्यात अनेक लोकांनी आपली मते मांडली. हे विषय आल्याने मी बोललो नाही, वस्तुस्थिती आहे. मी महाराष्ट्रात जाऊन बोलेन,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी नंतर दिली.