"महाराष्ट्राची झाली सुटका..." भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्यावर काय म्हणाले राष्ट्रवादीचे नेते?

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली प्रतिक्रिया
"महाराष्ट्राची झाली सुटका..." भगतसिंग कोश्यारींच्या राजीनाम्यावर काय म्हणाले राष्ट्रवादीचे नेते?

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा अखेर राष्ट्रपतींकडून मंजूर करण्यात आला. यानंतर आता विरोधकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहेत. भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेळोवेळी टीका केली होती. या निर्णय ते म्हणाले की, "माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. हा अतिशय चांगला निर्णय घेण्यात आला आहे. पण, हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारले की, राज्यपालांनी संविधान विरोधी जे निर्णय घेतले होते, त्याचे काय होणार? यावर ते म्हणाले की, “जर संविधानाच्या विरोधात काही झाले असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी.”

तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट केले की, "महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे. महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो. नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत," असे म्हणत त्यांनी टोलादेखील लगावला आहे.

तर, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "उशिरा का होईना राज्यपाल यांचा राजीनामा मंजूर झाला. नवे येणारे राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत दहा वर्षे काम केले आहे. त्यामुळे त्यांनाही मी जाऊन भेटणार आहे. राजकीय विषय बाजूला ठेवा, पण महापुरुषांच्या बद्दल केलेले भाष्य अतिशय दुर्दवी आहे." अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in