
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल मुंबई दौऱ्यादरम्यान मुंबईतील अनेक विकासकामांचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी शिंदे - फडणवीस सरकारच्या कामांचे कौतुकही केले. मात्र, त्यांनी केलेल्या या दौऱ्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीदेखील ट्विट करत निशाणा साधला. ते म्हणाले की, "हा कार्यक्रम प्रकल्पांच्या लोकार्पणाचा होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता? हेच काळात नाही आहे." असे म्हणत त्यांनी टीका केली.
रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एका जुना फोटो शेअर करत ट्विट केले की, "काल मुंबईमध्ये झालेला कार्यक्रम बघून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता, की एकमेकांचा कौतुक सोहळा होता? हेच कळत नाही. मला तर वाटते या कार्यक्रमातील भाषणे ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काहीकाळ गोड झाला असेल!”
पुढे त्यांनी आणखी एक ट्विट करताना म्हणाले की, “मात्र, २०१६मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारकाच्या भूमीपूजनासाठी घेऊन आलेल्या गड-किल्ल्यांच्या पवित्र मातीने नक्कीच मूक अश्रू ढाळले असतील. अरबी समुद्रातील त्या खडकानेही आश्चर्याने कान टवकारले असतील!” अशी टीका करत अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
दरम्यान, काल पंतप्रधान मोदींनी अनेक प्रकल्पांचे लोकार्पण केले, मात्र, यातील काही प्रकल्प हे शिवसेनेच्या कार्यकाळात झाले आहेत. यामुळे मुंबई महापालिका तोंडावर असताना ठाकरे गटाचे नेते आणि भाजपमध्ये मोठी लढाई सुरु होणार असल्याचे चित्र दिसत आहे.