
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या मुद्द्यावरून चर्चा सुरू होती. विरोधकांनीदेखील वारंवार यासंदर्भात मागणी केली होती. मात्र, महाराष्ट्र पोलीस यासंदर्भात तपास करतील, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. आता सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात सर्व तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे.
न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची गुरुवारी सुनावणी झाली. या सुनावणीनंतर न्यायालयाने वरील आदेश दिले. ‘नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वासाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. या प्रकरणात गुंतलेले कुणीही स्वच्छ आहेत, असे आमचे म्हणणे नाही’, असे न्यायमूर्तींनी यावेळी नमूद केले.