एकीकडे शिवसेनेतून बंडखोरांना कारवाईचा इशारा देण्यात येत आहे, तर दुसरीकडे त्यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्नही करण्यात येत आहेत. बंडखोर आमदारांचे मन वळवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होत असल्याचे पाहून आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. रश्मी ठाकरे आता बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधून त्यांचे मन वळवत आहेत.
एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४०हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोरच्या अडचणी वाढल्या असून, सरकार राहणार की जाणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. बंडखोर आमदारांना समजवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांकडून केला गेला; मात्र त्याचा अद्याप तरी काही उपयोग झालेला दिसत नाही. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील सर्व बंडखोरांना समजवण्याचा प्रयत्न केला; मात्र ते त्यांचेही ऐकेनासे झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे त्या बंडखोरांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांशी मेसेज करून चर्चा केली होती. बंडखोर आमदारांचे म्हणणे आहे की, ते सध्या शिवसेनेतच आहेत. बंडखोर आमदार आपण शिवसेनेसोबत असल्याचे सांगत आहेत; मात्र ते गुवाहटीतून मुंबईत यायला तयार नाहीत. त्यामुळे शिवसेनेत सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बंडखोरांचे मन वळवण्यात अपयशी ठरले आहेत. आता या राजकीय लढतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे. शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या पत्नींना स्वत: रश्मी ठाकरे यांनी फोन लावला आहे. त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.