
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपला असतानाच आरे कॉलनीतील गणपती विसर्जनाला तातडीने बंदी घालता येणार नाही. त्यामुळे यावर्षी आरे कॉलनीतील तलावांमध्ये गणपती विसर्जना परवानगी द्यावी, अशी विनंती आरे सीर्ईओंना केल्याची कबुली महानगरपालिकेने दिली. तसे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले.
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आरे कॉलनीतील छोटा काश्मीर तलाव, गणेश मंदिर तलाव आणि कमल तलाव या तीन तलावांमध्ये गणपती विसर्जनावर बंदी घाला, अशी मागणी करीत वनशक्ती संस्थेने याचिका दाखल केली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी शुक्रवारी प्रतिज्ञापत्र सादर केले.
आरेतील तलावांमध्ये अनेक वर्षांपासून गणपती विसर्जन केले जाते. येथील गणपतींच्या विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था करण्याकरीता आता पुरेसा वेळ नाही. त्यामुळे यंदा गणपती विसर्जनाला परवानगी देण्यात यावी, अशी भूमिका महापालीकेने मांडताना गणपती विसर्जन झाल्यानंतर तलावांचा परिसर स्वच्छ केला जाईल, अशी हमी दिली आहे. आरे कॉलनी हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर आहे. त्यादृष्टीने पर्यावरणासंबंधी केंद्र सरकारच्या नियम, अटी-शर्तींचे टप्प्याटप्प्याने पालन केले जाईल, हमी प्रतिज्ञापत्राद्वारे दिले आहे.