माशांसाठी पाण्याखाली पेडल्स बसवणार बाणगंगा तलाव परिसराचा जीर्णोद्धार
मुंबई : मलबार हिल येथील बाणगंगा तलावात पिंडदान केल्यानंतर माशांचे मृत्यू रोखण्यासाठी तलावात पाण्याखाली पेडल्स बसवण्यात येणार आहे. यामुळे हवा खेळती राहिल आणि माशांचे मृत्यू रोखणे शक्य होणार आहे. तसेच तलावाशेजारी भिंत उभारणे, १५ ते १६ दीपस्तंभांना हेरिटेज लूक मिळणार आहे. यासाठी मुंबई महापालिका ५ कोटी तर सीएसआर फंडातून १ कोटी असे एकूण ६ कोटी रुपये खर्च करणार आहे.
बाणगंगा तलावाचे बांधकाम शिलाहार राजाच्या काळात सन ११२७ मध्ये करण्यात आले असून १७१५ मध्ये या परिसराचा जिर्णोद्धार झाला असल्याची नोंद आहे. पितृपक्षात बाणगंगेच्या काठी विविध धार्मिक विधी पार पाडले जातात. पितृपक्षात बाणगंगा तलावात मोठ्या प्रमाणावर पिंडदान करण्यात येते, त्यामुळे माशांचे मृत्यू होतात. त्यामुळे तलावात पाण्याखाली पेडल्स बसवण्यात येणार असून यामुळे हवा खेळती राहिल आणि माशांचे मृत्यू रोखणे शक्य होईल. बाणगंगा तलावाच्या आऊटलेटवर बटरफ्लाय बसवण्यात येणार असल्याने पाणीपुरवठ्यावर कंट्रोल करणे शक्य होईल आणि माशांच्या जीवाला धोका होणार नाही. यासाठी निविदा मागवल्या असून सामाजिक दायित्व फंडातून (सीएसआर) १ कोटी आणि पालिका ५ कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती पालिकेच्या डी. वॉर्डचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.
असे होणार काम!
बाणगंगा तलावाची स्वच्छता, रामकुंडची स्वच्छता करणे, तलावातील पाण्याचे शुद्धीकरण, पायऱ्यांची दुरुस्ती करणे, धोकादायक भिंत पाडून नवीन बांधणे, दीपस्तंभाचे जीर्णोद्धार करणे, बाणगंगा तलावातील आऊटलेटवर बटरफ्लाय बसवणे, जेणेकरून पुरवठा कंट्रोल करता येईल, माशांसाठी अंडर वॉटर पेडल्स लावणे, जेणेकरून हवा खेळती राहिल.