आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील दीड लाखांहून अधिक वीज कर्मचारी रविवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात वितरण व्यवस्थेला फटका बसत असून वीजनिर्मितीवरही परिणाम होत आहे. दरम्यान, कामगार संघटनांनी संप मागे न घेतल्यामुळे मंगळवारची त्यांच्यासोबत असलेली बैठक रद्द करण्यात आली, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. मात्र, बैठक रद्द झाली तरी कुटुंबप्रमुख म्हणून ते माझ्याशी कधीही चर्चा करू शकतात. कामगारांसाठी संवादाची दारे नेहमी उघडी आहेत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.