
मुंबई : कचरा इतरत्र न फेकता कचरा पेटीत टाकावा. रस्त्यावर नाल्यात कचरा टाकला तर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिला आहे. तसेच झोपडपट्टी परिसरात असलेल्या प्रसाधनगृहात अस्वच्छता निदर्शनास आढळल्यास थेट पालिकेच्या विभाग कार्यालयात तक्रार करा, असे आवाहन मुंबईकरांना मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, मुंबईत ८ हजार १०५ सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छता व निर्जंतुकीकरणाकडे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन खात्याने विशेष लक्ष दिले आहे. सार्वजनिक प्रसाधनगृहांची दिवसातून ५ ते ६ वेळा स्वच्छता करून निर्जंतुकीकरण केले जात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
मुंबईतील प्रमुख परिसरांप्रमाणे झोपडपट्टी आणि सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनास दिले आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन ) चंदा जाधव यांच्या सूचनेनुसार सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये आणि सर्व संबंधित खात्यांच्या सहकार्याने विशेष मोहीम राबवली जात आहे.
स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान
झोपडपट्टी बहुल भागांत स्वच्छतेसाठी 'स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान' (वस्ती स्वच्छता योजना) संपूर्ण मुंबईमध्ये सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून स्थानिक संस्थांनी झोपडपट्टीवासियांना स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी करुन घेऊन स्वच्छतेबाबत नागरी शिस्त प्रस्थापित करणे, परिसर कायमस्वरुपी स्वच्छ ठेवणे हा उद्देश आहे. लोकसहभाग, लोकवर्गणी आणि महानगरपालिकेचे सहाय्य अनुदान या माध्यमातून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक पातळीवर सार्वजनिक स्वच्छतेचे पालन करावे, असे आवाहनही महापालिकेमार्फत केले जात आहे.
प्रसाधनगृहांची स्वच्छता निर्जंतुकीकरणावर भर
मुंबईतील ८ हजार १०५ सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण याकडे विशेष लक्ष देऊन कार्यवाही करण्यात येत आहे. प्रसाधनगृह स्वच्छतेबाबत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे फलक प्रसाधनगृहांच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. तसेच, 'स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान' अंतर्गत माहिती पत्रकांचे घरोघरी जाऊन वितरण करण्यात येत आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा!
रहिवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. या व्यतिरिक्त पथनाट्य, जनजागृती फेरी याचेही आयोजन केले जात आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्ट्यांच्या परिसरात असलेल्या सर्व व्यावसायिकांना, दुकानदारांना प्लास्टिकच्या पिशव्या न वापरण्याविषयी सूचना दिल्या जात आहे, असे उपायुक्त चंदा जाधव यांनी सांगितले आहे .