वरुणराजाची दमदार इनिंग सुरू; मुंबईकरांचे पिण्याच्या पाण्याचे टेन्शन मिटले

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो
वरुणराजाची दमदार इनिंग सुरू; मुंबईकरांचे पिण्याच्या पाण्याचे टेन्शन मिटले

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात वरुणराजाची दमदार इनिंग सुरू असून ८ ऑगस्टपर्यंत सातही धरणात १३ लाख ४० हजार ५०८ दशलक्ष लिटर पाणीसाठा म्हणजेच ९२.६२ टक्के उपलब्ध झाला आहे. हा पाणीसाठा ऑगस्ट २०२३पर्यंत पुरणार आहे. मुंबईकरांची तहान भागवेल इतका पाणीसाठी उपलब्ध झाल्याने आता पिण्याच्या पाण्याचे टेन्शन मिटले आहे.

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. जून महिन्यात वरुणराजाने पाठ फिरवल्याने धरणातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला होता. सातही धरणात नऊ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने २७ जून रोजी १० टक्के पाणीकपात जाहीर केली होती; परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून धरणक्षेत्रात वरुणराजाची कृपादृष्टी झाली अन् पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. त्यामुळे १२ दिवसांतच १० टक्के पाणीकपात मागे घेण्यात आली; मात्र आता पुन्हा एकदा धरणात पावसाने दमदार हजेरी लावल्याने आतापर्यंत मोडक सागर, तानसा व तुळशी हे तीन तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाले असून, सद्य:स्थितीत ९२.६२ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in