
एकनाथ शिंदेंची बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर योग्य तो तोडगा काढतील. माझा शिंदेच नव्हे तर कुणाशीही संवाद झाला नाही. शिंदेंनी ठाकरेंपुढे भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवल्याची मला कल्पना नाही किंवा त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचेही मला ठाऊक नाही. पण, उद्धव ठाकरे यावर योग्य तो तोडगा काढतील व सरकार त्यांच्या नेतृत्वात यापुढेही सक्षमपणे चालेल असा मला ठाम विश्वास आहे’, असे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या घटनाक्रमावर योग्य तो तोडगा काढतील असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. ते नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजपने आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो फोल ठरला. त्यानंतर सलग अडीच वर्षे सरकार सुरळीत चालत आहे. त्यामुळे भाजपकडून सरकार पाडण्याचे असे प्रयत्न होत आहेत,’ असे पवार म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या कालच्या निकालानंतर आपण नाराज नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.