हैदराबाद : भारतीय जनता पक्ष तेलंगणात सत्तेवर आला तर अयोध्येतील राम मंदिरात तेलंगणातील नागरिकांना विनामूल्य भेट देण्याची व्यवस्था भाजप करील, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी गडवाल येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना केली.
काँग्रेसने गेल्या ७० वर्षांपासून राम मंदिराच्या उभारणीत अडथळे आणून दिरंगाई केल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे ‘भूमिपूजन’ केले होते आणि २२ जानेवारी २०२४ रोजी 'प्राण प्रतिष्ठा' केली जाईल, असे ते म्हणाले.
तेलंगणात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी शहा यांनी सभेतील उपस्थित मतदारांना आवाहन केले आणि पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वांसाठी अयोध्येत प्रभू रामाचे दर्शन विनामूल्य करील, असे सांगितले. तेलंगणातील के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकारला लक्ष्य करताना ते म्हणाले, ‘‘त्यांनी मुस्लिमांना धर्मावर आधारित आरक्षण दिले, जे घटनेला धरून नाही. भाजपने धार्मिक आरक्षण रद्द करण्याचा आणि ओबीसी आणि एसटीचा कोटा वाढवण्याचे ठरविले आहे. काँग्रेस आणि बीआरएस या दोन्ही पक्षांना 'मागासवर्ग विरोधी' पक्ष म्हणून संबोधत त्यांनी दावा केला की केवळ भाजप आणि पंतप्रधान मोदीच मागासवर्गीयांचे भले करू शकतात. मागासवर्गीय नेत्याला राज्याचा मुख्यमंत्री करण्याच्या भाजपच्या आश्वासनाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.