
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गगनयान मिशनच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी भारताने २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक स्थापन करण्याचे आणि २०४० पर्यंत चंद्रावर माणूस पाठवण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना सांगितले. तसेच वैज्ञानिकांना व्हिनस ऑर्बिटर मिशन आणि मार्स लँडरवर नवीन उद्दिष्टांनुसार काम करण्यासही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, गगनयान मिशनवर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. अंतराळ विभागाने मिशनचे सर्वसमावेशक सादरीकरण केले, ज्यात प्रक्षेपण वाहने आणि सिस्टम पात्रता यासारख्या आतापर्यंत विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानाचा समावेश आहे. ह्युमन रेटेड लॉन्च व्हेईकलच्या तीन अनक्रूड मिशन्ससह सुमारे २० मोठ्या चाचण्या नियोजित केल्या आहेत. या बैठकीत मिशनच्या तयारीचे मूल्यांकन करण्यात आले आणि २०२५ पर्यंत त्याचे प्रक्षेपण निश्चित करण्यात आले.
या बैठकीत पंतप्रधान मोदींनी निर्देश दिले की, भारताने आता महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांवर काम केले पाहिजे, ज्यात २०३५पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक स्थापन करणे आणि २०४०पर्यंत चंद्रावर मानव पाठवणे समाविष्ट आहे. भारताच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांच्या भवितव्यावर झालेल्या बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी भारतीय शास्त्रज्ञांना आंतरग्रहीय मोहिमांच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले, ज्यामध्ये व्हिनस ऑर्बिटर मिशन आणि मंगळावरील लँडर यांचा समावेश असणार आहे.