राज ठाकरेंचं मोदींना पत्र; म्हणाले, "तशी फरफट पुन्हा..."

राज यांनी थेट मोदींना पत्र लिहून यावर तो़डगा काढण्याची विनंती केली आहे.
राज ठाकरेंचं मोदींना पत्र; म्हणाले, "तशी फरफट पुन्हा..."

दिल्ली येथे सुरु असलेलं कुस्तीपटूंचं आंदोलन दिल्ली पोलिसांनी मोडून काढल्यानंतर देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त केला गेला. अनेकांनी यावरुन दिल्ली पोलीस तसंच केंद्र सरकारवर टीका केली. 28 मे रोजीचे कुस्तीपटूंचे फोटो देशभर व्हायरल झाले. देशातील महान कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक बघून सर्वस्तरावरुन संताप व्यक्त झाल्याचं पाहायला मिळालं. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याप्रकरणावर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साद घातली आहे. राज यांनी थेट मोदींना पत्र लिहून यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "सन्मानीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, ज्यांचा गौरव आपण 'देश की बेटियाँ' असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली, असे कुस्तीपटू आक्रोश करत असताना 28 मे'ला ज्या पद्धतीने त्यांची फरफट झाली, तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वत: या विषयात लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून ध्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढवा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही विनंती." अशी विनंती त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

हे पत्र पंतप्रधानांना लिहताना राज ठाकरे यांनी मोदींना त्यांनी उत्तराखंड दुर्घटनेत तसंच मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात दाखवलेल्या सहहृदयतेची आठवण करुन दिली. त्यावेळी जशी आपण सहहृदयता दाखवली, तशीच सहहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालय तसेच निवासस्थानापासून काही किलोमीटरवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी, असं आवाहन त्यांनी आपल्या पत्रातून मोदींना केलं. तसंच खेळाडूंना फक्त कोणाच्याही 'बाहूबला'चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच खात्री सरकारकडून हवी असल्याचं देखील त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

गेल्या दीड महिन्यापासून भारताचे प्रमुख कुस्तीपटू दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीपटू हे आंदोलन करत आहेत. 28 मे रोजी पोलिसांनी कुस्तीपटूंचे आंदोलन मोडून काढले. यावेळचे फोटो देशभर व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली होती. यानंतर कुस्तीपटूंनी देखील आक्रमक भूमिका घेत आपली सर्व पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय किसान संघटनेनं वेळेत मध्यस्थी करत हा निर्णय मागे घ्यायला लावला. यानंतर कुस्तीपटूंनी सरकारला बृजभूषण यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाच दिवसांचा अवधी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in