गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या एका लेनचं काम पूर्ण करणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा दावा

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा 9 वा पाहणी दौरा केला.
गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या एका लेनचं काम पूर्ण करणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा  दावा

नवी मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचा वनवास काही संपता संपत नाही. गणपती पूर्वी महामार्गाची एक लेन तरी पुर्ण करणार असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिल्यामुळे ते रस्त्यावर उतरले आहेत. आतापर्यंत त्यांनी या महामार्गाचे आठ पाहणी दौरे केले असून आज त्यांचा पनवेल ते इंदापूर असा ९ वा पाहणी दौरा होता. अद्यावत टेक्नॉलॉजीचा वापर करत युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, मार्ग खडतर दिसत आहे. तरीही त्यांनी गणपतीच्या सणापूर्वी एक लेनच काम पूर्ण होणार असा दावा ठामपणे केला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई ते गोवा या महामार्गाचच्या कामाची पाहणी केली. आजच्या दौऱ्यात त्यांनी पनवेल ते वाकण फाटा नागोठाणेपर्यंतच्या कामाची पाहणी केली. पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यातील 84 किलोमीटरचा रस्ता पूर्ण क्षमतेने तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे यासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा व मशिनरीचा वापर होत आहे. पहिल्या टप्प्यातील पळस्पे फाटा तसेच जिते तर

कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील पांडापूर येथील व नागोठाणे येथील कामाची पाहणी केली. यावेळी अत्याधुनिक मशिनरी मागवण्यात आल्या आहेत त्याची सविस्तर माहिती उपस्थित अधिकार्‍याकडून घेतली. मुंबई गोवा पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने पांडापूर व नागोठणे येथे संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी बोलताना मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग वरील कासू पासून पुढील कामाची गती वाढविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) चे अधिकारी आणि ठेकेदारांना आदेश दिले आहेत. या टप्प्यातील ७ किमी चा रस्ता थोडा किचकट आहे. स्थिती पाहून नवीन तंत्राचा वापर केला जात आहे. खोलवर सिमेंट का‌ॅन्क्रीटचा वापर, अवजड वाहतुकीमुळे रस्ता खराब होऊ नये यासाठी रस्ता बनवताना २० टनी रोलरचा वापर केला जणार आहे. यासोबतच आधुनिक मशीन उपलब्ध करण्यात आले असून पांडापूर येथे त्याची पाहणी केली.

कासू पासून पुढील 7 किमी व नंतर 3.5किमी अंतरात आर्म टाॅपिग पद्धतीचा वापर होईल. या फेजमध्ये पळस, वाकण फाटा, जिंदल गेट, कोलाड, इंदापूर या भागात विविध अंतरानुसार कामाची विभागणी केली आहे. तर इंदापूर जवळचा टप्पा पूर्ण करताना 16 किमी अंतर व्हाईट टाॅपिंग तंत्राचा वापर केला जाईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. यासाठी नियुक्त अधिकारी व यंत्रणेच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला.

महामार्गाची कामे तातडीने होण्यासाठी तसंच वाहतुकीचा अडथळा येऊ नये यासाठी पोलीस विभागाचे सहाय्य घेण्याबाबत सूचना दिल्या. याबाबत त्यांनी पोलीस अधिक्षक सोमनाथ घागरे यांच्याशी चर्चा केली.

हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देश मंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले.

कोकणातील जनतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणाऱ्या हा महामार्गाची एक लेन गणेशोत्सवा पूर्वी वाहतुकीसाठी पूर्ण करण्यात येईल आणि ९ मीटर रुंदीच्या दोन्ही लेन डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येतील अशी माहिती यावेळी मंत्री चव्हाण यांनी दिलीे.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाचे बहुतांश काम जवळजवळ पूर्ण झाले यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, एनएचएआयचे मुख्य अभियंता संतोष शेलार, प्रकल्प अभियंता यशवंत घोटेकर, कार्यकारी अभियंता निरज चोरे यासह विविध विभागांचे अधिकारी होते.

महामार्गावरील दोन तासापासून सुरु वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला पुढाकार

मुंबई गोवा पाहणी दौरा सुरू असतानाच पेणजवळ हॉटेल साई सहारा जवळ एक एसटी बंद पडल्यामुळे या मार्गावर सुमारे दोन ते अडीच तास वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी सुटेना एसटी जागेवरच बंद पडल्यामुळे दोन्ही बाजूच्या मार्गिकेवरील गाड्या तब्बल दोन तास अडकल्या होत्या. त्यामुळे जिते गावाच्या पूलापासून हाॅटेल साई सहारा व तेथून पेण कडे जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही परिसरात वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती.

बंद एसटी बस जागेवरून काढण्याचे प्रयत्न सुरू होते अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण स्वतः रस्त्यावर उतरले व ते चालत हॉटेल साई सहारापर्यंत गेले. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत बंद एसटीला क्रेनच्या साहाय्याने बाजूला केले.

सुमारे दोन तासानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली व आता मुंबई गोवा महामार्गावरील पेण जवळील दोन्ही मार्गांवरील वाहतूक अखेर मार्गी लागल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या व गोवा कडे जाणाऱ्या सर्वच प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in