
एस.टी. महामंडळाने सहा वर्षांपूर्वी राज्यातील १३ शहरांमध्ये विमानतळाच्या धर्तीवर बस तळ (बस पोर्ट) उभारण्याचा निर्णय घेतला होता. पनवेलमध्ये हे वाहनतळ उभारण्यात येणार होते. मात्र ६ वर्षे उलटूनही पनवेलमध्ये अद्याप बस तळ उभे राहिलेले नाही. काही दिवसांपूर्वी या बस तळाचा आराखडा पनवेल महानगरपालिकेला सादर करण्यात आला असून त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
२३ जानेवारी २०१६ रोजी तत्कालीन माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्रातील प्रमुख अशा १५ शहरातील बस स्थानकांमध्ये विमानतळाच्या धर्तीवर दर्जेदार असे बस तळ उभारण्याची घोषणा केली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याच कार्यक्रमात एसटीच्या पनवेल येथील बस तळाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. नंतर बस तळाची संख्या कमी करत १३ बस तळांची उभारणी करण्यावर शिक्कामोर्तब झाले. पनवेल बस तळाच्या उभारणीला सुरुवात करून टप्प्याटप्प्याने अन्य ठिकाणी हा प्रकल्प राबविण्याचा महामंडळाचा मानस होता. मात्र पनवेल बस तळाचे भूमिपूजन झाल्यानंतरही कोणतेही काम झालेले नाही. दरम्यान,‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्वावर या बस तळांची उभारणी करण्यात येणार असून अटी व शर्तींमध्ये वारंवार करण्यात येणाऱ्या बदलांमुळे तसेच मागील दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे हा प्रकल्प रखडला आहे. या बस तळ ठिकाणी बसगाड्या, रेस्टॉरेंट, प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, वाहनतळ, प्रवाशांना बसण्यासाठी उत्तम सोय यासह अनेक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहे.
याठिकाणी होणार होते बस तळ
भिवंडी, पनवेल, नाशिक महामार्ग, औरंगाबाद, बोरिवली, धुळे, नांदेड, कोल्हापूर, सांगली, अकोला, नागपूर, शिवाजीनगर (पुणे), जळगाव येथील स्थानकांमध्ये बस तळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.