सरकारमधील काही मंत्री कमिशनची मागणी करतात; आमदार आशिष जैस्वाल
निधी वाटप करताना महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री कमिशनची मागणी करतात,” असा खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेना समर्थक आणि आमदार आशिष जैस्वाल यांनी केला आहे. “यासंदर्भात माझ्यासह अनेक आमदारांना असे अनुभव आले आहेत. हे अनुभव मी मुख्यमंत्र्यांना सांगणार असून, जर त्यानंतरही बदल झाले नाही तर आम्ही वेगळा विचार करू,” असेही आशिष जैस्वाल म्हणाले.
मोबदल्याची किंवा हिस्सेदारीची अपेक्षा ठेवणारे मंत्री कोण? या प्रश्नावर मात्र आशिष जैस्वाल यांनी थेट उत्तर दिले नाही. “या क्षणाला यापेक्षा जास्त मीडियासमोर बोलणं योग्य वाटत नाही. राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक झाली आणि तोपर्यंत या मुद्द्याचा सोक्षमोक्ष झाला नाही, तर त्यानंतर या मुद्द्यावर बोलू. तुम्ही वाट बघा, योग्य वेळ आल्यानंतर या मुद्द्याचा समाचार निश्चितच घेईन,” असे जैस्वाल म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक आमदारांचे असेच अनुभव आहेत; मात्र हे सर्व बोलण्यामध्ये त्यांना अडचण आहे. त्यामुळे मी फक्त माझी व्यथा सांगत नाही, तर अनेक आमदारांच्या मनातल्या वेदना माझ्या शब्दातून व्यक्त करत असल्याचे जयस्वाल म्हणाले. काही मंत्री ज्या पद्धतीने अपक्ष आमदारांच्या मतदारसंघातील कामाबद्दल उदासीनता दाखवतात, जाणूनबुजून नकारात्मक कृती करतात, अपक्ष आमदारांची कुचंबणा करतात, त्यांनी विसरू नये की, ते आमच्यामुळेच मंत्री आहेत, याची आठवणही आशिष जैस्वाल यांनी करून दिली.
“काही मंत्री चांगल्या पद्धतीने आमची कामं करतात; मात्र काही मंत्री आमदारांच्या मतदारसंघात निधी देत नाही. निधी देताना तो आमदाराला न विचारता तिथल्या इतर पक्षीय लोकांच्या हाती देतात. हे कोणत्याही आमदाराला सहन होणार नाही आणि मी स्वतः कधीही सहन करणार नाही. जे मंत्री चांगलं काम करतात. आमदारांच्या अडचणी समजून घेत त्यांचा सन्मान करत त्यांच्याविरोधात मी बोलणार नाही. अजित पवार, राजेश टोपे, एकनाथ शिंदे असे चांगलं मंत्री आहेत; मात्र काही मंत्री तसे वागत नाही. त्या मंत्र्यांबद्दल सध्या बोलणे योग्य वाटत नाही. कारण निवडणुकीपूर्व तसे बोलणे योग्य होणार नाही; मात्र २० तारखेनंतर त्या मंत्र्यांची पोलखोल नक्कीच करणार,” असा इशारा जैस्वाल यांनी दिला आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडूनच
“राज्यसभा निवडणुकीमध्ये मी शिवसेनेसोबतच राहणार आहे. मी, उद्धवजींचा कार्यकर्ता आहे. माझ्या शरीरामध्ये शिवसेनेचे रक्त आहे; मात्र आमदारांच्या मनामध्ये जी नाराजी आहे, ती दूर झाली पाहिजे. ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले पाहिजे आणि आमदारांना संरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी मी हे प्रयत्न करत आहे,” असे जैस्वाल म्हणाले. “अपक्ष आमदारांच्या मनामध्ये जी काही नाराजी आहे, अडचणी आहेत, त्यासंदर्भात पुढील दोन-तीन दिवसांत त्यांच्या अडचणी दूर केल्या जातील. मुख्यमंत्री यांची नाराजी दूर करतील,” असा विश्वासही जैस्वाल यांनी व्यक्त केला.