
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर-४ च्या हायव्होल्टेज सामन्यात रविवारी पाकिस्तानने भारतावर पाच विकेट्सनी विजय मिळविला. विजयासाठीचे १८२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १९.५ षटकांत पाच बाद १८२ धावा करीत साध्य केले. भारतीय गोलंदाजांचा टिच्चून गोलंदाजी करीत पाकिस्तानी फलंदाजीला वेसन घालण्याचा प्रयत्न शेवटच्या निर्णायक षटकांत निष्फळ ठरला. त्याआधी, भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ बाद १८१ धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य मिळाले. विराट कोहलीने ४४ चेंडूंत एक षटकार आणि चार चौकारांसह दमदार ६० धावा केल्या; पण त्या व्यर्थ ठरल्या.
हारिस रौऊफने रोहितला (१६ चेंडूंत २८) बाद केले. रोहितने रौऊफच्या चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला; मात्र चेंडू हवेत गेला. चेंडू उंच गेल्यामुळे पाकिस्तानच्या दोन खेळाडूंमध्ये झेल टिपण्यासाठी गोंधळ उडाला. अखेर, खुशदिल शाहने रोहितचा झेल टिपला. हा झेल टिपण्यासाठी पाकिस्तानचे दोन्ही खेळाडू एकमेकांना धडकले. त्यांची टक्कर टळल्याने दोघे बचावले.
नंतर शादाब खानने राहुलला (२० चेंडूंत २८) बाद केले. रोहित शर्मा एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. सूर्यकुमार यादवही (१० चेंडूंत १३) लवकर परतला. त्यामुळे ९.४ षट्कांत भारताची अवस्था ३ बाद ९१ अशी झाली. झटपट फलंदाज बाद झाल्याने धावगती रोडावली.
विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी डावाला आकार देण्याबरोबरच धावगती वाढविण्याचा प्रयत्न केला; परंतु ऋषभ फार काळ टिकू शकला नाही. १४व्या षट्कातील पाचव्या चेंडूवर ऋषभला (१२ चेंडूंत १४) शादाब खानने असिफ अलीच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
हार्दिक पंड्याला भोपळाही फोडता आला नाही. मोहम्मद हसनैनच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल मोहम्मद नवाझने टिपला. दीपक हुडा (१४ चेंडूंत १६) १९ व्या षट्कात बाद झाला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारच्या साथीने विराट कोहलीने (४४ चेंडूंत ६०) धावगती वाढविण्याचा प्रयत्न केला; परंतु शेवटच्या षट्कातील चौथ्या चेंडूवर तो धावबाद झाला. रवी बिश्नोईने शेवटच्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारत भारताची धावसंख्या ७ बाद १८१ अशी वाढविली. भुवनेश्वरला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रोहितने केला विश्वविक्रम
रोहितने यावेळी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. हा विश्वविक्रम याआधी न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सूझी बेट्सच्या नावावर होता. आतापर्यंत सूझीने टी-२० सामन्यांमध्ये ३ हजार ५३१ धावा केल्या होत्या. गेल्या सामन्यात रोहितने ३ हजार ५०० धावांचा टप्पा ओलांडला होता. त्यावेळी रोहितच्या नावावर ३ हजार ५२० धावा होत्या. रोहितने सुपर-४ सामन्यात २८ धावा केल्याने त्याच्या एकूण ३ हजार ५४८ धावा झाल्या. आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम रोहितच्या नावावर नोंद झाला. टी-२० मध्ये चार शतक झळकविणारा तो एकमेव फलंदाज आहे.