
टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीत होबार्टमध्ये शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने नेदरलँड्सवर ९ धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत आपले खाते उघडले आणि भारताला मागे टाकले. पाकिस्तानविरुद्धच्या चित्तथरारक सामन्यात भारताने बाजी मारूनही बांगलादेशच्या विजयामुळे भारताची पीछेहाट झाली. झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याआधी सरस धावगतीमुळे बांगलादेश भारताला मागे टाकून अव्वल स्थानावर पोहोचला.
पाकिस्तानविरुद्ध रोमांचक विजय नोंदविल्यानंतर इतर चार संघांनी एकही सामना न खेळल्यामुळे टीम इंडिया दोन गुणांसह गट-२ च्या गुणतालिकेत रविवारी अव्वल स्थानावर असतानाच सोमवारी बांगलादेशने नेदरलँड्सवर विजय मिळविल्यानंतर गुणतालिकेत बदल झाला.
बांगलादेश आता सुपर-१२ मधील गट-२ च्या गुणतालिकेत दोन गुण आणि ०.४५० च्या निव्वळ धावगतीने अव्वल स्थानावर आहे. भारताचेही दोन गुण असले, तरी भारताचा नेट रनरेट बांगलादेशपेक्षा कमी आहे. त्यामुळे भारत दुसऱ्या स्थानावर राहिला. पाकिस्तानवर विजय मिळविल्यानंतर भारताचा नेट रनरेट ०.०५० इतका आहे. गट-२ मध्ये झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यानंतर गुणतालिकेत आणखी बदल होण्याची शक्यता आहे.