भारताने ऑस्ट्रेलियावर टी-२० मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळविल्याने आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल असलेला भारत मजबूत स्थितीत पोहोचला. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या तुलनेत गुणांमधील फरकही वाढला आहे.
भारताकडे मालिका विजयाआधी सहा गुणांची आघाडी होती, ती आता सात गुणांची झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, टीम इंडियाचे २६८ गुण झाले आहेत; तर इंग्लंडचे २६१ इतके गुण आहेत. पाकिस्तानविरुद्ध मालिका गमावल्याने इंग्लंडला हा फटका बसला. तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चढाओढ आहे. दोन्ही संघाचे प्रत्येकी एकूण २५८ गुण झाले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या उर्वरित तीनपैकी एक सामना जिंकल्यास इंग्लंड आपले दुसरे स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरेल. भारताविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिके चमकदार कामगिरी केल्यास त्यांना पाकिस्तानला मागे टाकता येईल.