ठाण्यात १४०० कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार

ठाणे महानगरपालिका प्रशासनाने सुमारे १४०० रहिवाशांना रेंटल हाऊसिंगमधील घरे रिकामी करण्याच्या नोटीस बजावल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ऐन परीक्षांच्या काळात स्थलांतराचा आदेश मिळाल्याने रहिवासी हवालदिल झाले असून, “आता मुलांना घेऊन कुठे जायचे?” असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
ठाण्यात १४०० कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

ठाणे : ठाणे महानगरपालिका प्रशासनाने सुमारे १४०० रहिवाशांना रेंटल हाऊसिंगमधील घरे रिकामी करण्याच्या नोटीस बजावल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ऐन परीक्षांच्या काळात स्थलांतराचा आदेश मिळाल्याने रहिवासी हवालदिल झाले असून, “आता मुलांना घेऊन कुठे जायचे?” असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

२०१३ पासून ठाणे महापालिकेने धोकादायक इमारतींतील नागरिक, झोपडपट्टीधारक तसेच रस्ते रुंदीकरण व नाल्यांलगत राहणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांना एमएमआरडीएच्या रेंटल हाऊसिंग प्रकल्पांमध्ये तात्पुरती राहण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. या योजनेंतर्गत हजारो कुटुंबांना सुरक्षित निवारा मिळाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाकडून ‘दोस्ती रेंटल’मधील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटीस देण्यात येत आहेत. या नोटिसांमध्ये अनेक वर्षांचे थकीत भाडे भरण्याचे निर्देश देण्यात आले असून, केवळ ११ महिन्यांसाठी तात्पुरता निवारा देण्यात आला होता, त्यामुळे आता घरे रिकामी करावीत, असे नमूद करण्यात आले आहे.

२५ मार्चपर्यंत घरे महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

धोकादायक इमारतीतील रहिवाशांना ११ महिन्यांसाठी रेंटल घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. त्या कालावधीत स्वतःचा निवासाचा प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. मात्र २०१३ ते २०१५ पासून अनेक रहिवासी तेथेच वास्तव्यास असून काहींनी भाडेही भरलेले नाही. त्यामुळे आता थकीत भाडे भरून घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

उमेश बिरारी, उपायुक्त महानगरपालिका ठाणे

स्थलांतराच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण

लहान मुले, महिला यांच्यासह अचानक कुठे जायचे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यामुळे सध्या सुमारे १४०० कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. दरम्यान, राज्यात पहिली ते नववीच्या शालेय परीक्षा २२ एप्रिलपर्यंत निश्चित करण्यात आल्या असून, या रेंटल प्रकल्पांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढील आठवड्यात सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत स्थलांतराच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला असून त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत असल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in