कल्याण-मुरबाड रेल्वेच्या प्रत्यक्ष कामाला सप्टेंबरअखेर सुरुवात होणार -रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

तब्बल सात दशकांपासून कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची प्रतिक्षा केली जात होती.
कल्याण-मुरबाड रेल्वेच्या प्रत्यक्ष कामाला सप्टेंबरअखेर सुरुवात होणार -रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

कल्याण-मुरबाड रेल्वेच्या प्रत्यक्ष कामाला सप्टेंबरअखेर सुरुवात होईल, असे आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना बुधवारी दिले. या प्रकल्पाच्या निविदा मंजूर करण्याची कार्यवाही वेगाने करण्याचे आदेशही दिले. तसेच हा तुमच्या लोकसभेचा प्रोजेक्ट नसून, माझा महत्वाचा प्रोजेक्ट आहे,असे उद्गारही श्री. वैष्णव यांनी काढले.

तब्बल सात दशकांपासून कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची प्रतिक्षा केली जात होती. मात्र, २०१४ मध्ये खासदारपदी निवडून आल्यानंतर कपिल पाटील यांनी सातत्याने मुरबाडपर्यंत रेल्वेमार्ग मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले होते. २०१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा केली होती. त्यानंतर रेल्वेकडून विविध पर्याय तपासून पाहण्यात आले. सुरुवातीला उल्हानगर, त्यानंतर टिटवाळामार्गे मुरबाडपर्यंत रेल्वे नेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, अखेर कल्याण-आंबिवली-मुरबाड असा रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला. या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के वाटा उचलण्याची हमी महाविकास आघाडीकडून दिली गेली नसल्याचे निदर्शनास आणले. रेल्वे मंत्रालयाला महाराष्ट्र सरकारकडून ५० टक्के खर्चाची हमी घेतली जाणार असल्याचे पत्र पाठविले. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीतील रेल भवन येथे बुधवारी सायंकाळी भेट घेतली. तसेच रेल्वे मंत्रालयाला पुढील कार्यवाही करण्याची विनंती केली.

श्री. वैष्णव यांनी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग हा तुमच्या लोकसभेचा प्रोजेक्ट नसून, माझा महत्वाचा प्रोजेक्ट आहे, असे उद्गार काढले. तसेच या रेल्वे मार्गाबाबत सत्वर कार्यवाही करून रेल्वे विभागाच्या सर्व विभागीय तरतुदी पूर्ण करून, येत्या सप्टेंबरअखेरपर्यंत रेल्वेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, असे आश्वासन दिले. मुरबाड रेल्वे प्रकल्पाची निश्चित केलेली ८५७ कोटींची किंमत व त्याची व्यवहार्यता तपासून तो मंजुरीसाठी नीति आयोग व अर्थ मंत्रालयाकडे पाठविला जाईल. त्याला नीति आयोगाचे मूल्यांकन मिळाल्यानंतर २१ दिवसांत रेल्वेच्या विस्तारीत बोर्डाच्या बैठकीत मान्यता दिली जाणार आहे.

या प्रकल्पाला रेल्वे बोर्डात अंतिम मंजूरी दिली जाऊन, त्याच्या प्रती नीति आयोग, अर्थ मंत्रालय आणि सांख्यिकी विभागासह सर्व सदस्यांना वितरित केल्या जातील. विशेष म्हणजे एखाद्या प्रकल्पाची किंमत १ हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्याला रेल्वे मंत्री मंजूरी देऊ शकतात. त्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम सप्टेंबरअखेरपर्यंत प्रत्यक्षात सुरू होईल, अशी ग्वाही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in