शंख-शिंपल्याचे घर

समुद्रकिनाऱ्यावर सहज वेचले जाणारे शंख-शिंपले फक्त सुंदर आठवणी नसून, ते निसर्गातील नाजूक जीवांची घरे आहेत. त्यांची निर्मिती, रचना आणि उपयोग यामागे दडलेली निसर्गाची अद्भुत शास्त्रीय कहाणी खूपच रंजक आहे.
शंख-शिंपल्याचे घर
शंख-शिंपल्याचे घर(Photo-Yandex)
Published on

अजब निसर्ग

मकरंद जोशी

समुद्रकिनाऱ्यावर सहज वेचले जाणारे शंख-शिंपले फक्त सुंदर आठवणी नसून, ते निसर्गातील नाजूक जीवांची घरे आहेत. त्यांची निर्मिती, रचना आणि उपयोग यामागे दडलेली निसर्गाची अद्भुत शास्त्रीय कहाणी खूपच रंजक आहे.

कोणत्याही समुद्रकिनारी गेल्यावर, तिथल्या खडकाळ किंवा वाळूच्या बीचवरुन चालताना अगदी सहजपणे आपण काय करतो? तर वाळूत सापडणारे शंख-शिंपले गोळा करतो. सात-आठ वर्षांच्या मुलांपासून ते अगदी साठ पासष्टीच्या वृध्दांपर्यंत रुपेरी वाळूत शंख -शिंपले वेचायचा मोह सगळ्यांनाच होतो. विविध रंगाचे शिंपले आणि घाटदार, नैसर्गिक नक्षिने नटलेले लहान-मोठे शंख म्हणजे जणू सागराच्या खजिन्यातली रत्नेच. इतिहासकाळात चलन म्हणून वापरात असलेल्या कवड्यांपासून ते आजही दागिन्यांसारख्या वापरल्या जाणाऱ्या शिंपल्यांपर्यंत माणसाने या सागर संपत्तीचा वापर आपल्या सोयीने आणि पध्दतीने केला आहे. पण मुळात हे शंख शिंपले तयार कसे होतात ?आपोआप तयार होतात का निसर्गातील कोणी जीव त्यांना तयार करतात ? निसर्गातलं त्यांचं स्थान काय आहे ? या प्रश्नांची उत्तरे अतिशय रंजक आहेत आणि ती आपल्याला अजब निसर्गाच्या अनोख्या पैलूंचं दर्शन घडवतात.

सागर किनाऱ्यावरच्या वाळूतले किंवा एखाद्या नदीच्या प्रवाहातही मिळणारे शंख-शिंपले हे निसर्गातील ‘मोलुस्क’ म्हणजे मृदुकाय प्राण्यांची घरे असतात. या जीवसृष्टीतील प्राण्यांची विभागणी पृष्ठवंशिय म्हणजे पाठीचा कणा असलेले आणि अपृष्ठवंशिय म्हणजे कणा नसलेले या दोन प्रमुख गटात केली आहे. मोलुस्क किंवा मृदुकाय प्राणी हे अपृष्ठवंशिय (कणाहीन) प्राण्यांच्या गटात येतात. या प्राण्यांचे शरीर अतिशय मऊ, लिबलिबीत असे असते आणि त्यामुळेच त्यांना संरक्षणासाठी कवचाची गरज असते.हे मृदुकाय प्राणी समुद्राच्या तळापासून ते पर्वतशिखरांपर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या परिसरात पाहायला मिळतात. या मोलुस्कचे सहा वर्गात वर्गिकरण केलेलं आहे. त्यातील गॅस्ट्रोपोडा (उदरपाद),बायव्हाल्विया (द्विपुटी) या दोन गटातील प्राण्यांचे कवच म्हणजे आपण सागर किनारी गोळा करतो ते शंख शिंपले असतात.मोलुस्कमधील कवचधारी जीव फक्त समुद्रातच नाही तर जमिनीवरसुध्दा पाहायला मिळतात. सुरवातीला म्हणजे काही लाख वर्षांपूर्वी सगळ्याच मृदुकाय जीवांना कवच होते, उत्क्रांतीच्या ओघात त्यातील काही जातींचे कवच नष्ट झाले कारण त्यांनी बचावाचं वेगळं तंत्र विकसीत केलं.आज मृदुकाय जीवांचे जगभरात सुमारे एक लाख प्रकार आढळतात.

या मृदुकाय जीवांच्या शरीरातील मॅन्टल - शरीराचा पृष्ठभाग या भागाने त्यांच्या अंगावरील कवचाची(आवरणाची) निर्मिती केली जाते, दुरुस्ती आणि देखभाल केली जाते. जेव्हा परिस्थिती प्रतिकुल असते, अन्नाचा तुटवडा असतो किंवा अन्य काही कारणाने एखादा मृदुकाय जीव सुप्तावस्थेत जातो,आपली हालचाल थांबवतो तेव्हा मॅन्टलकडून कवचाची निर्मिती होत नाही. परिस्थिती पुन्हा अनुकुल झाली की मगच कवच निर्मिती पुन्हा सुरू होते.काही अपवाद वगळता सगळे मृदुकाय जीव त्यांच्या आयुष्यात एकच कवच(शंख /शिंपला)तयार करतात. वेगवेगळी प्रथिने आणि कॅल्शियम कार्बोनेट वापरून हे कवच तयार केलं जातं.हे त्या जीवाचं संरक्षक कवच असल्याने जस जसा तो जीव वाढत जातो तसं तसं हे कवच म्हणजेच शंख किंवा शिंपलाही मोठा मोठा होत जातो.पाण्यात किंवा जमिनीवर दिसणारी गोगलगाय आणि तिच्या पाठीवरचा शंख हे याचं उत्तम उदाहरण आहे.समुद्र किनाऱ्यावर आपण अनेकदा लहान लहान शंख हळू हळू सरकताना,चालताना बघतो, त्या शंखांमधले जीव म्हणजे खेकडे हे नेहमीच त्या शंखाचे मालक नसतात. हरमिट क्रॅब प्रकारचे खेकडे स्वतःच कवच तयार करू शकत नाहीत ते नेहमीच अन्य मृदुकाय जीवांचे कवच बळकावतात.अंगठ्याच्या नखाच्या आकारापासून ते चांगले आठ-दहा इंचांपर्यंत वेगवेगळ्या आकाराचे हर्मिट क्रॅब पाहायला मिळतात.त्यांचा आकार जसा वाढतो तसे ते अधिक मोठ्या आकाराचा शंख शोधतात.जर त्यांनी वाढत्या अंगाला झाकणारा शंख शोधला नाही तर त्यांचा जीव धोक्यात असतो.आपण माणसं जशी घरं बदलतो त्या प्रमाणे हर्मिट क्रॅब एकमेकांचे शंख ‘एक्सचेंज’ करतानाही पाहायला मिळतात. काही शंख अगदी गुळगुळीत असतात तर काही शंख खडबडीत, धारदार असतात. दोन्ही प्रकारच्या पृष्ठभागांच उपयोग शंखातील जीव आपल्या बचावासाठी करतात.

मृदुकायी जीवांची घरे मुख्यतः दोन प्रकारची असतात, एक तर शंख किंवा शिंपले. शिंपले हे प्रामुख्याने द्विपुटी म्हणजे दोन पाकळ्यांचे मिळून बनलेले असतात. मात्र आपल्याला किनाऱ्यावर जे सापडतात ते मृदुकाय जीवांनी वापरुन सोडून दिलेले,पाणी- वाऱ्याने वेगळे झालेले सुटे सुटे शिंपले असतात.या शिंपल्यांमध्येच मोत्याचे शिंपले येतात.या शिंपल्यांमध्ये मोती कशामुळे तयार होतो ? तर या शिंपल्यात जेव्हा एखादा वाळूचा कण किंवा पॅरासाइट ( परोपजिवी)प्रवेश करतो,तेव्हा त्याचा त्रास होऊ नये म्हणून शिंपल्यातील जीव त्या आगंतुकाभोवती एक आवरण तयार करतो.या आवरणाचे थरावर थर वाढवले जातात आणि ते घट्ट होऊ लागले की त्यात चमक येते.त्याचेच रुपांतर अखेर पाणीदार मोत्यात होतं.यातला आश्चर्यकारक भाग हा आहे की आपल्या मानवी शरीरातही अशाच प्रकारची क्रिया घडताना पाहायला मिळते.जेव्हा आपल्या शरीरात रोगाचे सूक्ष्म जंतू प्रवेश करतात,ज्यांचा बिमोड आपल्या शरीरातल्या व्हाइट सेल्स म्हणजे रक्तातल्या पांढऱ्या पेशी करू शकत नाहीत तेव्हा या पेशी शरीरातील संसर्गाभोवती आपले संरक्षण आवरण तयार करतात आणि त्याचा प्रसार होऊ देत नाहीत.या आवरणामुळे जी गाठ तयार होते त्याला ग्रॅनुलोमा म्हणतात.पण शिंपल्यात अशा आवरणाचे रुपांतर मोत्यात होते,मानवी शरीरात मात्र तसं काही घडत नाही !

या शंखाचे सर्वात अनोखं वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक सगळेच अगदी ९५ टक्क्यांपर्यंत शंख हे ‘उजवे’ असतात, म्हणजे त्यांचं मुख किंवा उघडा होणारा भाग उजवीकडे असतो.त्यामुळेच शंख गोळा करणाऱ्यांमध्ये ‘डाव्या’ शंखाना भरपूर मोल असतं.निसर्गात डावे शंख फार कमी प्रमाणात आढळतात कारण उजव्या शंखांबरोबर त्यांचं मिलन होऊ शकत नाही,त्यामुळे त्यांना स्वतःसारखा डावा जोडीदारच शोधावा लागतो, साहजिकच डावे शंख फारच कमी प्रमाणात निर्माण होतात. शंखाचे विविध आकार आणि वेगवेगळे रंग पाहायला मिळतात.त्याचप्रमाणे त्यांच्यावरील नक्षीतही वैविध्य असतं. मात्र ही विविधता केवळ सुंदर दिसण्यासाठी नसते.शंखाची रचना ही आतल्या मृदुकाय जीवाला सुरक्षितपणे जगता आणि वाढता यावे अशीच असते.अनेक शंखांचा पृष्ठभाग काटेरी असतो,या काट्यांमधून काही जातीच्या शंखांमधील जीव चक्क विषारी द्रव सोडून आपलं संरक्षण करतात.

इतिहासकाळातील कवड्यांचे चलन, आपल्या देवघरातील पूजेचा शंख,युध्दभूमीवर फुंकला जाणारा शंख,जपानमध्ये वापरण्यात येणाऱ्या शंखांच्या बासऱ्या या उपयोगांबरोबरच शंख शिंपल्यांचा उपयोग खत म्हणूनही केला जातो.मात्र या सगळ्या आधी हे शंख शिंपले म्हणजे निसर्गातील चिमुकल्या जिवांचे घर आहेत हे आपण विसरता कामा नये.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in