

काव्यकट्टा
एकनाथ आव्हाड
एक सरदार घोड्यावर,
दूरवर फिरून आला
फिरताना त्याच्या घोड्याचा,
नाल निखळून गेला
माझ्या पुढ्यात एवढे काम,
वेळ आहे कुणाला
केव्हातरी मारू नाल,
सरदार मनात म्हणाला
घरी येऊन पाहतो तर,
राजाचा हुकूम आला
रणभूमीवर युद्धासाठी,
बोलावले होते त्याला
घोड्यावर तो स्वार होऊन,
रणभूमीवर आला
घोडा मात्र वेगाने,
आज पळेनासा झाला
नाल नाही खुराला,
घोडा हळूच चालला
सरदाराचा चाबूक,
घोड्याशी खूप बोलला
वेग मंदावला घोड्याचा,
सरदार मागे राहिला
शत्रूच्या हाती सापडून,
अखेर बंदिवान झाला
म्हणून कुठल्याही गोष्टीचा,
वेळीच विचार करावा
वेळच्या वेळी कामाचा,
सतत आग्रह धरावा
साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक
eknathavhad23@gmail.com