नवी दिल्ली : जीएसटी दर कपात लवकरच लागू होणार असल्यामुळे मंजूर कार कर्ज रद्द करण्यासाठी बँकांना विनंत्या येत आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर प्रवासी वाहनांच्या किमती कमी होतील आणि त्यानंतर त्या खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेतही कपात झाल्यास पुन्हा कार कर्जासाठी अर्ज करण्याची ग्राहकांची भूमिका आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या ५६ व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत १,२०० सीसीपर्यंतच्या कारसाठी जीएसटी दरात मोठी कपात करण्यात आली होती, जी सध्याच्या २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आली आहे. २२ सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीमध्ये फेरबदल लागू झाल्यानंतर साबणापासून ते कार, शॅम्पूपासून ते ट्रॅक्टर आणि एअर कंडिशनरपर्यंत जवळजवळ ४०० उत्पादने स्वस्त होतील.
२२ सप्टेंबरपर्यंत ज्या ग्राहकांचे कार कर्ज मंजूर झाले होते ते आता रद्द करण्यासाठी संबंधित शाखेशी संपर्क साधत आहेत, कारण त्यांना जीएसटी कपात लागू झाल्यानंतर खरेदी करायची आहे, असे एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
जीएसटी कपातीमुळे फायद्याच्या
तुलनेत कर्ज रद्दचे शुल्क खूपच कमी
२२ सप्टेंबरनंतर मिळणाऱ्या फायद्याच्या तुलनेत कर्ज रद्द करण्याचे शुल्क खूपच कमी असल्याने, कर्जदारांना दर कपात सुरू झाल्यानंतर नवीन कर्ज प्रक्रिया निवडत आहेत. पावसाळ्याच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बँकांनी वाहन आणि गृहकर्जांवरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, जर कार डीलरने ग्राहकांना बीजक जारी केले असेल तर कारवर जुना जीएसटी दर लागू होईल. जर कार डीलरने बीजक जारी केले नसेल तर ग्राहक नवीन जीएसटी दराचा लाभ घेऊ शकतात.
दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, कर्जदार आता दर कपातीची वाट पाहत असल्याने आणि २१ सप्टेंबरपर्यंतच्या श्राद्ध कालावधीमुळे कार घेण्यास विलंब झाला आहे. काही ग्राहक आता १,३०० सीसी श्रेणी अंतर्गत कारच्या चांगल्या आवृत्तीचा पर्याय निवडत आहेत, कारण त्यांना १० टक्के फायदा मिळत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.