जळगाव : अलायन्स एअरमार्फत जळगाव ते दिल्ली अशी २ मेपासून सुरू होणारी हवाई सेवा तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जळगावकरांना या सेवेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जळगाव-दिल्ली तसेच जळगाव-इंदूर विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती. ही सेवा सुरू झाल्यास व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचे मानले जात होते. लोकप्रतिनिधींनीही यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर अलायन्स एअर कंपनीने २ मेपासून सेवा सुरू करण्याची घोषणा करत वेळापत्रक जाहीर केले होते आणि तिकीट विक्रीलाही सुरुवात केली होती. दिल्ली-इंदूर-जळगाव असा मार्ग असलेली ही सेवा सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. रेल्वेने दिल्ली गाठण्यासाठी लागणारे १५ ते १७ तासांचे अंतर विमानसेवेने अवघ्या तीन तासांत पार करता येणार होते.
मात्र, १ मे रोजी या विमानसेवेसाठी आवश्यक असलेली डीजीसीएची (महानागरी विमान वाहतूक महासंचालनालय) तांत्रिक मंजुरी मिळालेली नसल्याची माहिती पुढे आली. तसेच कंपनीकडे विमानांची कमतरता असल्याचेही कारण देण्यात आले आहे. त्यामुळे २ मेपासून सुरू होणारी सेवा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.