पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र स्वतंत्रपणे न देता ते ‘एकत्रित’ स्वरूपात दिले जाणार आहेत. गुणपत्रकावर विद्यार्थ्याचे नाव अधिक सुटसुटीत आणि इतर शासकीय कागदपत्रांशी सुसंगत असणार आहे.
मंडळाने नावाचा क्रम बदलून तो ‘विद्यार्थ्याचे नाव- वडिलांचे नाव-आडनाव’ असा सलग करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी या संदर्भात सर्व विभागीय मंडळांना अधिकृत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांपासून केली जाणार आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन स्वतंत्र कागदपत्रे दिली जात होती, परंतु आता ही दोन्ही कागदपत्रे एकाच पानावर एकत्रितपणे छापली जातील.