मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत आतापर्यंत ८७.७९ टक्के मतदार-विशिष्ट गणना अर्जांचे वाटप करण्यात आले असून, ६०.४४ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बुलेटिननुसार, ३० जून ते ८ ऑगस्टदरम्यान ही मोहीम राबवली जात आहे. एकूण ९,७८,५४,०४९ मतदारांपैकी ८,५९,०५,००५ अर्जांचे वाटप झाले असून, ५,९१,४२,६२४ अर्जांचे डिजिटायझेशन झाले आहे. १ लाखांहून अधिक बूथ लेव्हल अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) हे काम केले जात आहे.
अर्ज वाटपात हिंगोली जिल्हा ९९.९८ टक्क्यांसह राज्यात अव्वल आहे. त्यापाठोपाठ जळगाव (९९.९१ टक्के), बुलढाणा (९९.८१ टक्के), अमरावती (९९.७७ टक्के), वर्धा (९९.७६ टक्के) आणि सिंधुदुर्ग (९९.७३ टक्के) यांचा क्रमांक लागतो. डिजिटायझेशनमध्ये रत्नागिरी ८६.०३ टक्क्यांसह आघाडीवर आहे. यवतमाळ (८५.२० टक्के), बुलढाणा (८२.६६ टक्के), हिंगोली (८२.६३ टक्के), परभणी (८१.९४ टक्के), गडचिरोली (८०.८४ टक्के) आणि चंद्रपूर (८०.०२ टक्के) यांनीही चांगली कामगिरी केली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र मतदारांची ओळख पटवणे, दुबार किंवा अपात्र नोंदी हटवणे आणि मतदार याद्या अचूक व अद्ययावत करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मुंबई, ठाणे आणि पुण्यात डिजिटायझेशनचा वेग कमी
प्रमुख शहरी जिल्ह्यांमध्ये ठाण्यात ६७.९७ टक्के वाटप आणि २७.५६ टक्के डिजिटायझेशन, मुंबई उपनगर ६७.७९ टक्के आणि २८.७२ टक्के, मुंबई शहर ७२.३७ टक्के आणि ३८.८८ टक्के, तर पुण्यात ७० टक्के वाटप आणि ४५.०४ टक्के डिजिटायझेशन नोंदवले गेले. नाशिकमध्ये ८५.७८ टक्के वाटप व ५७.८८ टक्के डिजिटायझेशन, तर पालघरमध्ये अनुक्रमे ७९.७३ टक्के आणि ३९.९५ टक्के काम पूर्ण झाले आहे.