बीड : मराठ्यांनी मुंबईत येऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. मात्र, यावेळी त्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही. ही मराठा समाजाच्या आरक्षणाची ‘शेवटची’ लढाई असल्याचे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी जाहीर केले.
बीड जिल्ह्यातील मंजारसुंबा येथील सभेत बोलताना ते म्हणाले, मराठा समाजाच्या मोठ्या प्रमाणावरील उपस्थितीने सरकार हादरले पाहिजे. मुंबईत पोहोचल्यानंतर सरकारवर खरा दबाव येईल. लढाई आता मुंबईत होणार आहे. मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचे नाही. यापुढे भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरू देऊ नका, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सरकारने आधी मान्य केले होते. पण आता आरक्षण दिले जात नाही. हैदराबाद आणि साताऱ्याचे गॅझेट लागू करावे, त्यातील ५८ लाख नोंदी सापडल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण दिले जात नाही, त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकत्याच २९ जाती ओबीसीत आरक्षणामध्ये सामील करून घेतल्या. त्यांची मागणी नसतानाही त्यांना दिले. पण मराठ्यांची मागणी असतानाही मराठ्यांना आरक्षण दिले जात नाही. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाही, ही पोटदुखी कशासाठी? असा सवाल त्यांनी केला.
जरांगे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्यांचा डीएनए ओबीसी आहे, मग शेतकरी ओबीसी नाही का? त्यांना कर्जमाफी करा. फडणवीस हे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणे लावत आहेत. आपण जातीयवादी नाही, त्यांनी तसा अपप्रचार केला. आता देवेंद्र फडणवीसांनी कितीही प्रयत्न केला तरी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
जरांगे म्हणाले की, "मुंबईत शांततेत जायचे आणि शांततेत आरक्षण घ्यायचे. सरकारने आपल्या मोर्चात काही दगडफेक करणारी माणसे पाठवली आहेत. पण आपण त्यांचा हेतू साध्य करू द्यायचा नाही, असे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणासाठी आयुष्य पणाला लावलेय, उद्या आरक्षणासाठी अंगाचे कातडे जरी फडणवीसांनी मागितले तरी ते देणार. जातीसाठी मरण आले तरी बेहत्तर, मी मरायला घाबरत नाही, असे जरांगे म्हणाले.
मराठा समाजातील बांधवांना २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘चलो मुंबई’ मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचे त्यांनी जाहीर केले असून, शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही त्यांची मागणी आहे. २७ ऑगस्ट रोजी जालन्यातील आपल्या मूळगावी अंतरवाली सराटी येथून ते या मोर्चाला सुरुवात करणार आहेत.
सरकारने आरक्षण दिले तर आम्हाला मुंबईला जाण्याची काहीही इच्छा नाही. आम्ही इथेच ते साजरे करू, असे ते म्हणाले. आपल्या पुढच्या पिढ्यांचे आयुष्य आपण नासवू नये. काही गडबड झाली तरी कोणी पळू नये. जर कोणी दगडफेक केली तर त्याला पोलिसांच्या हवाली करा. दगडफेक करणारे आपले लोक नाहीत, ते सरकारचे कारस्थान असू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.