मुंबई : मनसे व शिवसेनेने केलेल्या तीव्र विरोधानंतर हिंदी सक्तीचा निर्णय शासनाने रद्द केला. त्यामुळे मराठी माणसाच्या मनात मनसे व शिवसेनेसाठी आपुलकी वाढली आहे. त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मनसेने आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून मनसेचे नेते, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुखांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. मात्र कुठल्या ठिकाणी शिबिराचे आयोजन केले हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.
सोमवारी सकाळी १० वाजता कपड्याची बॅग घेऊन थेट शिवतीर्थावर या, असे फर्मान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जारी केले आहे. दरम्यान, सोमवार ते बुधवार तीन दिवस इगतपुरी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून विविध विषयांवर राज ठाकरे नेते, विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख आदींना मार्गदर्शन करणार असल्याचे मनसेच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यातील शालेय शिक्षणात हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मनसेने केलेल्या जोरदार विरोधानंतर हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता. मनसेने पुकारलेल्या या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही मैदानात उतरला होता. त्यानंतर दोन्ही पक्षाकडून विजयी मेळावा आयोजित करण्यात आला त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र एका मंचावर आले होते. मात्र त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवर मत प्रदर्शन करू नये, अशी ताकीद राज ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतर आता यासंदर्भातील चर्चेसाठी राज ठाकरे यांनी थेट नेतेमंडळींची कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा इगतपुरी येथे आयोजित केली आहे.
राज ठाकरे यांनी शनिवारी पक्षाचे नेते, सरचिटणीस, शहरप्रमुख आणि विभाग अध्यक्षांना फर्मान जारी केले आहे. या आदेशानुसार सोमवारी सकाळीच सर्वांनी दोन दिवसांच्या बॅग भरून शिवतीर्थावर दाखल होण्याची सूचना केली आहे. त्यानंतर दोन दिवसांसाठी मुंबईच्या बाहेर कार्यशाळेसाठी जायचे असून याबद्दल कुठेही बोलू नये, अशी तंबीही त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिली आहे.