पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी न्यायालयात तब्बल १८८६ पानांचे विस्तृत आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष म्हणजे सुरुवातीपासून ज्यांच्या नावाभोवती संशयाची सुई होती, ते दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची नावे या आरोपपत्रातून वगळण्यात आली आहेत. यामुळे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील या दोघांनाही मोठा दिलासा मिळाला असून त्यांना एकप्रकारे 'क्लीनचिट' मिळाली असल्याचे बोलले जात आहे.
पुणे पोलिसांनी दाखल केलेल्या या दोषारोपपत्रामध्ये केवळ शीतल तेजवानी यांचेच नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, मुंढवा येथील या जमिनीच्या व्यवहारातील आर्थिक गैरव्यवहाराला शीतल तेजवानीच पूर्णपणे जबाबदार असून, त्यांच्यावरच मुख्य ठपका ठेवण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे विभागाने तपासाअंती सादर केलेल्या अहवालात पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्याविरुद्ध कोणतेही आरोप ठेवण्यात आलेले नाहीत. अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच, या कायदेशीर प्रक्रियेत त्यांचे नाव न आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही न्यायाची थट्टा - दमानिया
पोलिसांनी सादर केलेल्या या आरोपपत्रावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, केवळ शीतल तेजवानीवरच कारवाई का झाली, असा सवाल विचारला आहे.