मुंबई : बेस्ट उपक्रमाचा तोटा १६ हजार कोटींवर गेला आहे. बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी तब्बल २८ हजार कोटींची गरज आहे. यासाठी बेस्ट उपक्रमाने पुढील २० ते २५ वर्षांचा प्लॅन तयार केला असून यात २२ डेपोंचा कायापालट करण्यात येणार आहे. यात कर्मचारी निवासस्थान, १० हजार बेस्ट बसेस, ३६ हजार खासगी वाहनांची पार्किंगसह संकुल बांधण्यात येणार आहे.
मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिका आणि राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी सांगितले.
बेस्टचे महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी समितीसमोर प्रकल्पाचे सादरीकरण केले. या प्रकल्पासाठी सल्लागार नेमून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार असून पुढील २० ते २५ वर्षांचा विकास आराखडा त्यामध्ये निश्चित केला जाईल. या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही प्राथमिक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या बेस्टची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असून संचित तूट ७,३२२ कोटी रुपये आहे.
असा होणार कायापालट
२२ बस आगारांचे अत्याधुनिक संकुलांमध्ये रूपांतर
१० हजार बसांची क्षमता असलेली आधुनिक डेपो व्यवस्था
बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवासी वसाहती
३६ हजार कार क्षमतेचे सार्वजनिक पार्किंग
क्रीडा, सांस्कृतिक, कला केंद्र आणि संग्रहालयाची उभारणी
आरोग्य, शिक्षण आणि व्यावसायिक संकुलांचा विकास
सर्व जमिनींची मालकी बेस्ट उपक्रमाकडेच कायम राहणार