वसई : बुलेट ट्रेन प्रकल्प देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून तिथे अंकित मिश्रासारख्या लाचखोर आणि वादग्रस्त ठेका अभियंत्याची नियुक्ती भविष्यात राष्ट्रीय सुरक्षेसोबत तडजोड करणारी ठरू शकते. त्यामुळे अंकित मिश्रा याची केवळ बुलेट ट्रेन प्रकल्प कामासाठी केलेल्या नियुक्तीच रद्द करू नये, तर त्यास पालिका सेवेतूनच त्वरित कमी करण्यात यावे, अशी मागणी वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांकडे स्वराज अभियानचे अध्यक्ष धनंजय गावडे यांनी केली आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि विविध विकास प्रकल्पांना गती देण्याच्या नावाखाली आयुक्त स्तरावरून कनिष्ठ अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.
या बदली प्रक्रियेतील सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे ठेका अभियंता अंकित गणेश मिश्रा याची बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामासाठी करण्यात आलेली विशेष नियुक्ती होय!
मे २०२५ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तत्कालीन उपसंचालक, नगररचना यांच्यावर टाकलेल्या धाडीनंतर अंकित मिश्रा याची नगररचना विभागातून २८ मे २०२५ रोजी बदली करून सार्वजनिक बांधकाम येथे नियुक्ती केली होती. अंकित मिश्रा या ठेका इंजिनिअरची पालिका कारकीर्द कायम वादग्रस्त असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या आरोपपत्रात दाखल केलेल्या अंकित गणेश मिश्रा याचे जबाब सोबत जोडले आहेत. या जबाबामध्ये अंकित गणेश मिश्रा याने आर्किटेक्ट व बिल्डरकडून लाच स्वीकारणे, तत्कालीन कमिशनर व उपसंचालक नगररचना यांचे वतीने करोडो रुपये स्वीकारणे व त्यांनी सांगितलेल्या जागेवर लाचेची रक्कम पोहचवणे असे व इतर गंभीर गुन्हे केल्याचा जबाब नोंदविलेला असल्याच्या बाबीकडे गावडे यांनी पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.