अमित श्रीवास्तव/मुंबई
जुहू येथील आर. एन. कूपर रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणामुळे दोघा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पहिल्या घटनेतील रुग्ण या गोरेगाव पश्चिमेतील असून दुसरे रुग्ण हे नालासोपारा येथील आहेत. या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेण्यात आली असून बीएमसीच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून माहिती मागवण्यात आली असून वरिष्ठ डॉक्टरांशीही चर्चा केली जाणार आहे.
पहिल्या घटनेत गोरेगाव (पश्चिम) येथील संध्या यादव (२७) यांचा सोमवारी पहाटे आयसीयूमध्ये स्ट्रेचरवरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोटातील दुखण्यामुळे त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज दिला होता, मात्र प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना परत आणण्यात आले. त्यांना आयसीयूमध्ये हलवले. पहाटे २ च्या सुमाराला आयसीयूमधून मोठा आवाज ऐकू आला. आत गेल्यावर त्या जमिनीवर पडलेल्या दिसल्या. पुन्हा नाकावाटे नळी टाकताना त्यांना रक्तस्राव झाला. सकाळी त्यांना मृत घोषित करण्यात आले.
दुसऱ्या घटनेत नालासोपारा येथील कैलास सिंह (३८) यांचा शनिवारी रात्री आयसीयू बेड वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि रक्तदाब कमी झाल्याने दाखल केले होते.