Mumbai : म्हाडा लॉटरीसाठी मुदतवाढ; १४ मेपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या सविस्तर 
मुंबई

Mumbai : म्हाडा लॉटरीसाठी मुदतवाढ; १४ मेपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या सविस्तर

मुंबईतील म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत १४ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. विक्रोळी, वांद्रे, वडाळा, दादरसह विविध भागांतील घरांसाठी नागरिकांना अर्ज करता येणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. म्हाडाने मुंबई गृहनिर्माण सोडतीअंतर्गत उपलब्ध असलेल्या २,६४० घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. आता इच्छुक अर्जदारांना १४ मे २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

माहितीनुसार, योजनेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर ही मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक पात्र अर्जदारांना विविध कारणांमुळे वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना संधी मिळावी, यासाठी म्हाडाने हा निर्णय घेतला आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही मुदतवाढ महत्त्वाची मानली जात आहे.

शहरातील विविध भागांमध्ये घरे उपलब्ध

या गृहनिर्माण योजनेतील घरे मुंबईतील विविध भागांमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, दादर आणि पहाडी गोरेगाव या परिसरांचा समावेश आहे. त्यामुळे अर्जदारांना आपल्या सोयीच्या ठिकाणानुसार घर निवडण्याची संधी मिळणार आहे.

ताबा देण्यापूर्वी दुरुस्तीची हमी

म्हाडाकडून लाभार्थ्यांना आणखी एक महत्त्वाचा दिलासा देण्यात आला आहे. सोडतीत मिळणाऱ्या घरांमध्ये आवश्यक दुरुस्ती आणि कामकाज पूर्ण करूनच ताबा दिला जाणार आहे. त्यामुळे घर मिळाल्यानंतर अतिरिक्त दुरुस्तीचा खर्च नागरिकांवर पडणार नाही.

सुधारित वेळापत्रक जाहीर

सुधारित वेळापत्रकानुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मे २०२६ आहे. तर अनामत रकमेचा भरणा १५ मे रोजी बँकिंग वेळेत करता येणार आहे. प्राथमिक अर्जदार यादी २२ मे रोजी प्रसिद्ध केली जाईल. यानंतर दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी २५ मे पर्यंत मुदत दिली जाईल. अंतिम यादी २९ मे रोजी जाहीर केली जाणार आहे.

जूनमध्ये होणार सोडत

या घरांसाठीची अंतिम सोडत ५ जून २०२६ रोजी काढली जाणार आहे. सोडतीचे ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाने दिली आहे.

मुंबईत वाढत्या घरांच्या किमतीमुळे स्वतःचं घर घेणं अनेकांसाठी कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत म्हाडाची ही योजना हजारो कुटुंबांसाठी मोठी संधी ठरू शकते.

प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर कामावरून काढणे कायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे विधान परिषदेसाठी जठार, कोल्हेंना उमेदवारी

पानसरेंच्या पुस्तकावरचा वाद असंवेदनशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबईत वीजपुरवठा विस्कळीत; अनेक ठिकाणी ८ ते १० तास वीज गायब

नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना; अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस